अर्थमंत्र्यांना ‘ढंग की बात’ करता येत नाही- शशी थरूर

0
471

पुणे, दि. २२ (पीसीबी)-  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाचे कौतुक करणारे काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी पुण्यातील कार्यक्रमात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर थेट टीका केली आहे. पंतप्रधान मोदी हे ‘मन की बात’ करतात. अर्थमंत्र्यांना ‘ढंग की बात’ करता येत नाही. हे लोक ‘जन की बात’ कधी करणार, असा सवाल थरूर यांनी केला.

ऑल इंडिया प्रोफेशनल्स काँग्रेसतर्फे पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये खासदार थरूर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी राजकारण, मॉब लिंचिंग आदी मुद्द्यांवर विविध मते मांडली. पंतप्रधान मोदींच्या कामाचे कौतुक करणारे थरूर यांनी यावेळी केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांना लक्ष्य केले. पंतप्रधान मोदी हे मन की बात करतात, पण अर्थमंत्र्यांना ‘ढंग की बात’ करता येत नाही, हे लोक जन की बात काय करणार, असा सवाल त्यांनी केला. मॉब लिंचिंगच्या घटनांकडेही त्यांनी लक्ष वेधले. भारतात वाढती धार्मिक हिंसा चिंताजनक असल्याचे ते म्हणाले. पुण्यातील मोहसीन शेखच्या हत्येपासून वाढत असलेल्या मॉब लिंचिंगच्या घटना या लांच्छनास्पद आहेत. हिंदू धर्म आणि प्रभू श्रीरामांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांसाठी ही बाब शरमेची बाब आहे, असे खडे बोल त्यांनी सुनावले.

विद्वान आणि प्रोफेशनल्स यांनी राजकारणापासून दूर राहणे दुर्दैवी असल्याचे मतही थरूर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला काँग्रेस नेते संजय झा यांचीही उपस्थिती होती. नरेंद्र मोदी हे राष्ट्रपिता आहेत, असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांच्यावर टीकास्त्र सोडले. राष्ट्रपिता कोणाला म्हणतात हे त्यांनी माहीत करून घ्यावे, असे झा म्हणाले.