मुंबई, दि. २४ (पीसीबी) – शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्यावर विरोधकांकडून टीका केली जात असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनीही शिवसेनेची खिल्ली उडवली आहे. ‘अयोध्येला निघालो जोशात, राजीनामे मात्र अजूनही खिशात’ असे लिहिलेले फलक मनसेने शिवाजी पार्क परिसरातील सेना भवनाच्या समोरच लावले आहेत. त्यामुळे हा फलक चर्चेचा विषय ठरला आहे.
शिवसेना आणि मनसे यांच्यामध्ये अनेकवेळा पोस्टरयुद्ध झाले आहे. आता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसेने उपरोधिक मजकूर असलेले पोस्टर लावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र आदित्य ठाकरेही अयोध्येला जात आहेत. ठाकरे कुटुंब सकाळी ११ वाजता विशेष विमानाने मुंबई विमानतळावरुन रवाना होणार आहेत. तर दुपारी २ वाजता फैजाबाद विमानतळावर त्यांच्या आगमनाचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा उचलून धरला आहे. शिवसेनेने अयोध्येत रॅलीचे आयोजन असून रविवारी उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे.