अयोध्या निकाल: शांतता राखा, हा निकाल कोणाचा विजय किंवा पराभव नाही – नरेंद्र मोदी

0
381

नवी दिल्ली, दि. ९ (पीसीबी) – शनिवारी (९ नोव्हेंबर) येणाऱ्या अयोध्येचा ऐतिहासिक निकालाकडे देशवासिंयांचे लक्ष लागले आहे. या निकालाकडे जय-पराजयाच्या दृष्टीकोनातून पाहू नका. हा निकाल म्हणजे कोणाचा विजय किंवा पराभव नाही, निकाल काहीही येवो. देशातील नागरिकांनी शांतता, एकता आणि सद्भावना कायम राखावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत देशवासियांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्री तसेच भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना वादग्रस्त विधान न करण्याची सूचना केली आहे. संघ परिवार तसेच, मुस्लीम संघटनांनीही लोकांना शांतता राखण्याचे आणि निकालाचा आदर करण्याची विनंती केली आहे. दोन्ही समाजात सलोखा आणि सामंजस्य राहावे यासाठी गेल्या आठवडय़ात बैठकाही झाल्या होत्या.

उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत देशातील जनतेला शांतता कायम राखण्याचं आवाहन केलं आहे. “सर्वोच्च न्यायालयात गेल्या काही महिन्यापासून अयोध्या प्रकरणावर निरंतर सुनावणी होत होती. या काळात समाजातील सर्व वर्गांकडून सौहार्दाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही चांगली गोष्ट होती. शनिवारी येणाऱ्या कोर्टाच्या निर्णयानंतरही आपल्याला शांतता कायम राखायची आहे. कोर्टाकडून येणारा निर्णय म्हणजे जय-पराजय नाही. शांती, आणि एकता कायम राखणं ही आपल्या देशाची महान परंपरा आहे. या परंपरेला आणखी बळ द्या.”