Maharashtra

अयोध्या निकाल कोर्टाचा असेल, सरकारचा नाही – संजय राऊत

By PCB Author

November 09, 2019

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – अयोध्येत बाबरी मशीद पडली आणि बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेनंतरत देशात हिंदुत्वाची लाट आली आणि त्याच लाटेवर आज अनेकजण उभे आहेत, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्याचे नाव न घेता लगावला. बाबरी मशीद पडली तेव्हा काही लोक पळून गेले होते, तेव्हा बाळासाहेब ठाकरे हेच पुढे आले होते. हे लक्षात घेता अयोध्येत भविष्यात मंदिर उभारणीत शिवसेनेचे मोठे योगदान आहे असे संजय राऊत म्हणाले. अयोध्या प्रकरणावरील हा ऐतिहासिक निकाल कोर्टाचा असेल, सरकारचा नाही असेही राऊत म्हणाले.

राज्यात सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाल्यानंतर दररोज पत्रकार परिषदांचा धडाका लावणाऱ्या शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी आजही पत्रकार परिषद घेतली. मात्र, राऊत यांनी आज घेतलेली पत्रकार परिषद ही सत्तेबाबतची नव्हती, तर ती होती रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमीन वादाबाबतच्या खटल्याच्या निकालाबाबत.