अमेरिकेचे ऐकाल तर परिणाम भोगावे लागतील; इराणचा भारताला इशारा

0
454

न्यूयॉर्क, दि. ११ (पीसीबी) – चाबहार बंदराबाबत झालेल्या करारानुसार गुंतवणूक न केल्यास आणि कच्चे तेल आयातीत कपात केल्यास भारताला परिणाम भोगावे लागतील असा इशारा इराणने भारताला दिला आहे. अमेरिकेच्या दबावात येऊन जर भारताने तेल आयात कपात केली तर त्यांना देण्यात आलेला विशेषाधिकाराचा दर्जा काढून घेण्यात येईल असा थेट इशारा इराणने दिला आहे. एकीकडे अमेरिकाचा दबाव आणि दुसरीकडे इराणचा इशारा यामुळे भारत कात्रीत सापडल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. त्यामुळे यावर केंद्र सरकार कसा तोडगा काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इराणचे उपराजदूत मसूद रजवानियन रहागी म्हणाले की, जर भारताने इंधन आयात कपात केली आणि ते सौदी अरेबिया, इराक आणि अमेरिकेसह इतर देशांकडे इंधन खरेदीसाठी गेले तर त्यांचा विशेषाधिकाराचा दर्जा संपुष्टात आणण्यात येईल. चाबहार बंदराच्या विस्तारासाठी भारत ठरल्याप्रमाणे गुंतवणूक करण्यात अपयशी ठरला आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. यासंबंधी भारताकडून योग्य ते पाऊल उचलले जाईल, अशी आम्हाला आशा आहे. चाबहार बंदरात त्यांचे सहकार्य आणि भागिदारी सामारिक रूपाने अत्यंत महत्वाची आहे, असेही ते म्हणाले.
रहागी एका परिषदेत भारताबरोबरील संबंधांबाबत बोलत होते. व्यापारासाठी चाबहार बंदर भारतासाठी अत्यंत महत्वाचे आहे. ओमानच्या खाडीत असलेल्या या बंदरामुळे भारत पाकिस्तानला टाळून इराण आणि अफगाणिस्तानशी थेट व्यापार करू शकतो.