अमेठी, दि. २४ (पीसीबी) – अमेठी हा लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेला मतदारसंघ. इथे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि भाजप नेत्या, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यात टक्कर होती. राहुल यांचा अमेठीत पराभव झाल्यानंतर अमेठीतील राजकीय चित्र पालटले आहे. अशा प्रकारे संजय गांधी यांच्यानंतर राहुल असे ‘गांधी’आहेत, ज्यांना अमेठीच्या जनतेने नाकारले आहे. या विजयाने सद्गदीत झालेल्या स्मृती इराणी यांनी अमेठीतील जनतेसाठी नवी पहाट उगवली आहे, अशी प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त केला.
अमेठीतील विजयानंतर स्मृती इराणी यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. आपला विजय म्हणजे अमेठीवासीयांसाठी एक नवी पहाट नवा संकल्प घेऊन उगवल्याचे स्मृती यांनी म्हटले आहे. ट्विटमध्ये त्यांनी अमेठीकरांना धन्यवाद दिले आहेत. अमेठीतील जनतेने विकासावर विश्वास दाखवत कमळाचे फूल फुलवल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.