Desh

अमृतसरमध्ये निरंकारी भवनावर ग्रेनेड हल्ला; तीन जण ठार

By PCB Author

November 18, 2018

अमृतसर, दि. १८ (पीसीबी) – राजासांसी परिसरातील आदिवाल गावात निरंकारी भवन येथे केलेल्या  ग्रेनेड हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० जण जखमी झाले आहेत. आज (रविवार) दुपारी १२ च्या सुमारास हा ग्रेनेड हल्ला झाला. येथील निरंकारी भवनामध्ये सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी मंचाच्या दिशेने ग्रेनड फेकला. यानंतर परिसरात खळबळ उडाली.

या हल्ल्यानंतर अमृतसरसह संपूर्ण राज्यात नाकाबंदी करण्यात आली आहे. नोएडा, दिल्ली, गुरुदासपूर, पठाणकोटसहीत इतर शहरांमध्ये सतर्कतेचा आदेश देण्यात आले आहेत. जखमींना रूग्णालयात दाखल केले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगतिले जात आहे.

हा दहशतवादी हल्ला होता का याबाबत कसून तपास सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच अमृतसर पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला होता, तसेच ज्या गावात ही घटना घडली ते गाव भारत-पाकिस्तान सीमेवर असल्यामुळे हा दहशतवादी हल्ला होता का याबाबत पोलीस तपास करत आहेत.