नागपूर, दि. १६ (पीसीबी) – आमच्या जातीला आरक्षण नाही, तेच बरे आहे, अन्यथा मी कुठेतरी बाबू झालो असतो. मी घरच्यांना आधीच सांगितले होते, मला नोकरी करणारा नाही तर नोकरी देणारा व्हायचे आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज (सोमवार) येथे सांगितले.
नागपुरात आयोजित अखिल माळी समाजाच्या महाअधिवेशनात नितीन गडकरी बोलत होते.
गडकरी म्हणाले की, मी सगळ्याच समाजांच्या कार्यक्रमात जातो, प्रत्येक समाजा मागणी केली जाते की आम्हाला राजकारणात जागा मिळाली पाहिजे, मंत्रीपद आमच्या समाजाला मिळाले पाहिजे. मात्र, विशिष्ट समाजातील माणूस मंत्री झाला की त्याच्या हातून विकास होईलच असे नाही, त्याला सगळ्यांचाच विचार करावा लागतो .
आम्ही असे नेते तयार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे जे देशाला विकासाचे लक्ष्य गाठून देतील. काही जण कर्तृत्त्वाने हरतात, ते तिकिट मागण्यासाठी जातीचा आधार घेतात. आरक्षण मिळाल्याने सगळा विकास होतो हा समज चुकीचा आहे. कर्तृत्त्वही विकास घडवता येतो, त्यामुळे आपण जे काम करतो त्या कामालाही महत्त्व दिले पाहिजे, असेही गडकरी यांनी सांगितले.