Maharashtra

अनेक आमदार, नेते शिवसेनेच्या संपर्कात – संजय राऊत यांचा दावा  

By PCB Author

October 03, 2018

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – भाजपला रामराम करणाऱ्या आशिष देशमुख यांच्याप्रमाणे इतर प्रमुख पक्षातील अनेक नाराज आमदार, नेते आमच्या संपर्कात आहेत, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सर्वजण योग्य वेळेची वाट पाहत, हळूहळू ते तुम्हाला दिसेल. शिवाय यामुळे इतरांचे आमदार फोडणाऱ्या भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे, असे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणाले की, “भाजपने शिवसेनेत गळ टाकला आहे आणि १७,१८,२० आमदार गळाला लागले आहे, असे म्हटले जात आहे. पण शिवसेनेला तडा जाऊच शकत नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना अभंग आणि मजबूत आहे. ज्यांनी या बातम्या सोडल्या, चलबिचल केली, त्यांचेच आमदार, खासदार आज सोडून जात आहेत. त्यांच्याच पक्षात अस्वस्थता आहे.”, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

आशिष देशमुखांसारखे अनेक आमदार आपल्या संपर्कात आहेत, असा प्रश्न विचारला असता राऊतांनी सांगितले की, “हो आहेत, महाराष्ट्रील प्रमुख पक्षातील अनेक आमदार, महत्त्वाचे नेते शिवसेनेच्या संपर्कात आहेत. ते योग्य वेळेची आणि संधीची वाट पाहत आहेत. त्यात अनेक मोठी नावे आहेत, योग्य वेळी तुम्हाला कळेल.”, असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.