“अनिल देशमुख यांच्यासाठी येणारे दिवस कठीण”

0
157

मुंबई, दि. १४ (पीसीबी) : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यासाठी येणारे दिवस कठीण असतील, असे सूचक वक्तव्य भाजप खासदार मनोज कोटक यांनी केले. येत्या काही दिवसांमध्ये आणखी काही मंत्र्यांचं बिंग फुटणार आहे. त्यांनाही राजीनामे द्यावे लागतील, असा गर्भित इशारा मनोज कोटक यांनी दिला. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात मनोज कोटक यांच्या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणाचा आतापर्यंतचा एकूण घटनाक्रम पाहता भाजप नेत्यांना अनेक गोष्टींची वेळेआधीची चाहुल लागल्याचे दिसून आले होते. त्यामुळे देशमुखांसाठी आगामी दिवस कठीण असतील, या मनोज कोटक यांच्या वक्तव्याचा अर्थ नक्की काय असावा, याविषयी सध्या तर्कवितर्क लढवले जात आहेत.

तर दुसरीकडे अनिल देशमुख हे आज केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) चौकशीला सामोरे जाणार आहेत. काहीवेळापूर्वीच ते ज्ञानेश्वरी बंगल्यावरुन सांताक्रुझच्या डीआयओच्या कार्यालयात जाण्यासाठी बाहेर पडले. आता ते डीआयओच्या कार्यालयात पोहोचले आहेत. त्यानंतर सीबीआयचे अधिकारी अनिल देशमुख यांच्या चौकशीला सुरुवात करतील. अनिल देशमुख यांची चौकशी झाल्यानंतर सीबीआय सोमवारी प्राथमिक चौकशीचा अहवाल निष्कर्षासह उच्च न्यायालयात सादर करेल. त्यामुळे अनिल देशमुखांची चौकशी ही निर्णायक ठरणार आहे.

परमबीर सिंह चौकशीत काय म्हणाले होते?
सीबीआयने याप्रकरणात नुकतीच परमबीर सिंह आणि समाज सुधारक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांची चौकशी केली होती. त्यावेळी पालांडे यांनीच संजय पाटील आणि डीसीपी राजू पाटील यांना 100 कोटी रुपये वसूल करण्यासंदर्भात सांगितले होते, अशी माहिती परमबीर सिंह यांनी सीबीआयला दिली होती. प्रत्येक बारकडून 2 ते 3 लाख रुपये वसूल झाले पाहिजेत, अशी अनिल देशमुख यांची अपेक्षा असल्याचे पालांडे यांनी दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले होते. या आरोपावर अनिल देशमुख काय बोलणार, हे पाहावे लागेल.