Desh

अनिल अंबानींना वाचवण्यासाठी सीबीआय संचालकांना सक्तीच्या रजेवर पाठवले – राहुल गांधी  

By PCB Author

October 25, 2018

नवी दिल्ली, दि. २५ (पीसीबी) – उद्योगपती अनिल अंबानी यांना वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर  पाठवले आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (गुरूवार) येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.  

राफेल व्यवहार संबंधित एका फाईलवर आलोक वर्मा काम करत होते.  वर्मा यांना पदावरून दूर करून त्यांची खोली सील करण्यात आली आहे. खोलीतील  महत्त्वाची कागदपत्रेही  गायब  करण्यात आली आहेत. पहाटे दोनच्या सुमारास हा सर्व   प्रकार करण्यात आल्याचे  राहुल गांधी यांनी  यावेळी सांगितले. पुरावे नष्ट करण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे. हा सर्व  खटाटोप  अनिल अंबानींना वाचवण्यासाठी सुरु आहे, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी राफेल कराराबाबत काहीही बोलण्यास तयार नाहीत.  या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकण्याची भीती त्यांना वाटत आहे, असे ते म्हणाले.  त्यांना तुम्ही पत्रकार परिषद घेण्यास सांगा. त्यावेळी त्यांना राफेलबद्दल चार-पाच प्रश्न विचारा. मला खात्री आहे की ते टेबलसकट पळून जातील, अशीही मिश्किल टिप्पणी  राहुल गांधी यांनी यावेळी केली.