अत्यंत गरज असल्यास मुंबईकरांनी घराबाहेर पडावे – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0
339
मुंबई दि. २१ (पीसीबी) –  खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने मुंबईसह महत्वाच्या शहरांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद केल्या आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री यांनी शनिवारी सकाळी पत्रकार परिषदेत नवीन चिंता बोलून दाखवली.
करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात सध्या चिंतेचं वातावरण निर्माण झालेले आहे. महाराष्ट्रात सध्या ६३ हून अधिक लोकांना करोनाची लागण झाली आहे. मुंबईतही काही करोनाचे काही नवीन रुग्ण आढळले आहेत.
मुंबई-पुणे यासारख्या शहरात इतर शहरे आणि राज्यांमधून कामाला येणारी लोके, करोनामुळे आपल्या गावी जाण्याच्या तयारीत आहेत. परिणामी लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी रेल्वे स्थानकावर रात्रीपर्यंत गर्दी होताना दिसत आहे. या गर्दीमुळे कोरानाची लागण होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे हा प्रकार थांबवायचा असल्यास, केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी अधिक रेल्वे गाड्या देण्याची गरज असल्याचे राजेश टोपे यांनी बोलून दाखवलं. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी यासंदर्भात बोलणे सुरु असून लवकरात लवकर महाराष्ट्रात नवीन रेल्वे गाड्या मिळतील असा विश्वास टोपे यांनी व्यक्त केला.
राजेश टोपे यांनी पुन्हा एकदा, मुंबई लोकले बंद करण्याचा विचार बोलून दाखवला. सध्याच्या घडीला लोकांना आवाहन करुनही रेल्वे आणि बेस्टच्या बसमध्ये गर्दी होताना दिसत आहे. महाराष्ट्रात परदेशातून प्रवास करुन आलेल्या लोकांमुळे विषाणूचा प्रसार होतोय. अशा परिस्थितीत सार्वजिक वाहतुक व्यवस्थेमधून प्रवास करणं धोकादायक ठरु शकते. त्यामुळे अत्यंत गरज असल्यास मुंबईकरांनी घराबाहेर पडावे. परिस्थितीमध्ये बदल झाला नाही तर आगामी दिवसांमध्ये मुंबईची लाईफलाईनही बंद करण्याचा निर्णय राज्य सरकार घेईल असे टोपे यांनी स्पष्ट केले.