अजित पवार यांच्या सभेत गोंधळ घालणाऱ्याचा संभाजी ब्रिगेडकडून सत्कार

0
336

बीड, दि. २१ (पीसीबी) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बीड दौऱ्यावेळी झालेल्या बैठकीत गोंधळ घालणाऱ्या तरुणाचा संभाजी ब्रिगेडकडून सत्कार करण्यात आला आहे. हनुमान फफाळ असे या तरुणाचे नाव असून त्याने अजित पवार यांची बैठक सुरु असलेल्या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली होती. खणखणीत आवाजात हनुमान फफाळ बराचवेळ घोषणाबाजी करत होता. तेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता संभाजी ब्रिगेडने माजलगाव येथे हनुमान फफाळ याचा भव्य सत्कार केला आहे. अजित पवार शुक्रवारी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि खरीप पेरणीसंदर्भात बीड जिल्हाधिकारी कार्यालयात जवळपास अडीच तास बैठक पार पडली. या बैठकीला पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह सर्व आमदार आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. त्यावेळी हनुमान फफाळ या तरुणाने जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करत अजित पवारांना भेटण्याची मागणी केली. मात्र पोलिसांनी त्यांना रोखलं. पोलिसांनी संबंधित तरुणाला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून बाहेर काढलं. त्यावेळी या तरुणाने घोषणाबाजीला सुरुवात केली. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणा या तरुणाने दिल्या. त्यानंतर पोलिसांनी हनुमान फफाळ यााला ताब्यात घेतले होते.

कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांवर लाठीमार
दुसरीकडे अजित पवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचा प्रकार आज बीडमध्ये घडला. जिल्हाधिकारी कार्यालयाती बैठक संपल्यानंतर अजित पवारांचा ताफा बाहेर पडत असताना कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांच्या ताफा अडवला. सरकारी नोकरीत समाविष्ट करुन घेण्याच्या मागणीसाठी हजारो कंत्राटी कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गोळा झाले होते. त्यात महिला कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.

बीड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जमा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अजित पवारांना भेटू देण्याची मागणी केली. मात्र, त्यांनी भेट दिली गेली नाही. बैठक संपल्यानंतर अजित पवार आणि राजेश टोपे यांचा ताफा निघाला असता तो कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अडवला. तेव्हाही या कर्मचाऱ्यांचं म्हणणं ऐकून न घेताच मंत्र्यांच्या गाड्या पुढे निघाल्या. त्यावेळी मोठा गोंधळ निर्माण झाला. हा गोंधळ शांत करण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.