“अजित दादा तुम्ही मुख्यमंत्र्यांशी प्रस्ताव करा. मी दिल्लीला नरीमन पॉईंटशी जोडतो”

0
556

पुणे, दि.२४ (पीसीबी) : पुण्यात आज सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचं भूमीपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. यावेळी नितीन गडकरी यांनी देशभरात सुरु असलेल्या विविध विकासकामांची यादीच वाचून दाखवली. मी दिल्लीत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतो, त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी कटिबद्ध आहे असं नितीन गडकरी यांनी सांगितलं.

उड्डाणपुलाचं उद्घाटन करताना नितीन गडकरी म्हणाले, ‘मुंबईतील वरळी- बांद्रा सी लिंकशी इमोशनल नातं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्त्वात या पुलाची जबाबदारी मला मिळाली. मला खूप शिकायला मिळालं. सी लिंक वसई -विरारपर्यंत न्यायचा माझी इच्छा होती. पण महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीमुळे झालं नाही’, असं नितीन गडकरी म्हणाले.

‘आता मी मुंबई-दिल्ली हायवे बांधतोय, 170 किमी स्पीडने गाडी चालवली, पोटातलं पाणी हललं नाही. 70 टक्के काम पूर्ण झालंय, महाराष्ट्रातील काम राहिलं आहे, जेएनपीटीपर्यंत हा रस्ता नेणार आहे. अजितदादा आपण मागणी केली वसई -विरारपासून वरळीपर्यंत हा रस्ता जोडला तर मी नरीमन पॉईंटवरुन दिल्लीला 12 तासात पोहोचता येईल. माझं वरळी- बांद्रा सी लिंकशी इमोशनल नातं, माझ्या खात्याकडे खूप पैसे आहेत, दिल्लीला नरीमन पॉईंटशी जोडून देण्याचं काम मी नक्की करेन, तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलून प्रस्ताव तयार करा’, असं आवाहन नितीन गडकरी यांनी केलं.

‘पुण्यात येताना दुख होतं, पुण्यातील हवा शुद्ध होती, माझी बहीण पुण्याची, स्वारगेटजवळ बहिण राहत होती, पर्वतीवर जाऊन खायचं, आताचे पुणे प्रदूषित झालं, जल,वायू आणि ध्वनी प्रदूषण याबाबत इंटरनॅशनल बेंचमार्क आहेत, त्याचं पालन करु. मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे, मी सगळ्या मंत्र्यांचे हॉर्न बंद केले, लाल दिवे काढले, मला ध्वनी प्रदूषणाचा त्रास लक्षात आला. मी ऑर्डर काढणार आहे, जर्मन व्हायलिनवादक होता, त्याने आकाशवाणीची ट्यून तयार केली होती, मी ती ट्यून शोधली, आता अॅम्ब्युलन्सवर ती लावणार, कानाला चांगलं वाटतं.’

‘माझी आयुष्यात एकच इच्छा, पेट्रोल-डिझेल बंद करणं, शेतकरी ही माझी इच्छा पूर्ण करु शकतात. मी राहुल बजाज यांचे चिरंजीव आणि टीव्हीएसचे श्रीनिवासन यांना म्हटलं, जेव्हापर्यंत तुम्ही इथेनॉल स्कूटर बनवत नाही, तोपर्यंत माझ्यापर्यंत येऊ नका, मी तुमचं काम करणार नाही. त्या दोघांनी इथेनॉल इंजिन बनवलं., ब्राझीलमध्ये १०० टक्के इथेनॉल आहे. आता रशियातून टेक्नॉलॉजी आणली आहे, १ लि. पेट्रोल बरोबर १ लि इथेनॉल’.

‘मी राजीव बजाजला बोलावतो, पुण्यातील ऑटो, बाईक, मी तीन चार महिन्यात ऑर्डर काढतोय, बीएमडब्यू पासून मर्सिडीज, टाटा महिंद्रा सर्वांना फ्लेक्स इंजिन पेट्रोलचं बनवावं लागेल, ज्यात शंभर टक्के इथेनॉल, शंभर टक्के पेट्रोल हा पर्याय ठेवावा लागेल.’

‘साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती केली तर गाड्या चालतील, प्रदूषण बंद होईल, शेतकऱ्यांना फायदा होईल. इथेनॉलसाठी मी पंतप्रधानांना विनंती केली,त्यांनी तीन पंप पुण्यात दिले. माझा ट्रॅक्टर सीएनजीवर आहे, १ लाख रुपये वर्षाला वाचतोय’, असं नितीन गडकरी म्हणाले.