अखेर विकास दुबे नावाची दहशत संपली .

0
271

कानपूर,दि. 9 (पीसीबी) : कानपूरमध्ये आठ पोलिसांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी कुख्यात गुंड विकास दुबेचा एन्काऊंटरमध्ये खात्मा करण्यात आला. विकास दुबे याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सच्या पथकाने कानपूर येथे आणले होते. परंतु शुक्रवारी सकाळी पोलिसांची गाडी पलटी झाली. तिथून विकास दुबेनं पोलिसांची बंदूक हिसकावत पळून जाण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान झालेल्या चकमकीत तो ठार झाला. दरम्यान, गुंड विकास दुबे चकमकीत ठार झाला की त्याचा पोलिसांनी ठरवून खात्मा केल्या याबाबत विविध चर्चा आहेत.

विकास दुबेला अटक केल्यापासून ते मृत्यूपर्यंत गेल्या 24 तासांत नेमकं काय घडलं?
गुरुवारी, 9 जुलै रोजी सकाळी 9.30 च्या सुमारास विकास दुबे याला उज्जैन येथील महाकाळ मंदिरात आत्मसमर्पण केले. मिळालेल्या माहितीनुसार, विकासने मंदिराच्या रक्षकांना आपले नाव सांगितले, त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली आणि त्याला अटक करण्यात आली. यानंतर उज्जैन पोलिसांनी सुमारे 8 तास त्याची चौकशी केली. मिळालेल्या माहितीनुसार, त्याने पोलिसांचे मृतदेह जाळण्याची इच्छा असल्याचे सांगितले होते.

दरम्यान, कानपूरमध्ये यूपी पोलिसांनी विकास दुबेची पत्नी ऋचा आणि तिच्या अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले. पोलिसांनी ऋचाला विचारपूस केली. उज्जैनमध्ये विकास दुबेच्या प्रकरणाची नोंद नसल्याने आणि कानपूर एसएसपीच्या विनंतीवरून त्याला संध्याकाळीच तिथे पोहोचलेल्या यूपी पोलिसांच्या एसटीएफच्या पथकाकडे सोपविण्यात आले. यानंतर एसटीएफची टीम मोठा ताफा घेऊन उज्जैन ते कानपूरकडे रस्ता मार्गे रवाना झाली. मध्यप्रदेशच्या भोपाल, गुना, झाशी आणि त्यानंतर उत्तरप्रदेश मधील रस्त्यांवर मोठा फौजफाटा होता. ज्या गाडीत विकास दुबे होता त्या गाडीच्या 10-12 किमीच्या अंतरावर कोणत्याही वाहनाला येण्याची परवानगी नव्हती. जवळपास 50 पेक्षा अधिक पोलिस विकास दुबे सोबत होते. एमपी ते यूपी या पूर्ण रस्त्यावर शेकडो पोलिस उपस्थित होते. शुक्रवारी, 10 जुलै रोजी पहाटे साडेसहा वाजता विकास दुबे याला घेऊन जाणारी एसटीएफची टीम कानपूर हद्दीत आली. संध्याकाळी 6.25 च्या सुमारास विकास दुबेला घेऊन जाणारे एसटीएफचे वाहन रस्त्यावर पटली झाले. यादरम्यान त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, सोबत पोलिसांची बंदूक ही हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांशी त्याची चकमक झाली. त्यात तो मारला गेला. या चकमकीत दोन पोलिसही जखमी झाले. जखमी अवस्थेत त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथं सकाळी 7.45 च्या सुमारास विकास दुबेला मृत घोषित करण्यात आलं.

काय आहे घटना?
कुख्यात गुन्हेगार विकास दुबेला पकडण्यासाठी पोलिसांची 40 जणांची टीम गावात पोहोचली. त्यानंतर जे घडलं ते फक्त चित्रपटात शोभून दिसलं असतं. उत्तरप्रेदशातली कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले अशी ही घटना आहे. पोलीस पोहोचल्याचा पत्ता लागल्यावर विकास दुबे याच्या टोळीने पोलिसांपासून वाचण्यासाठी रस्त्यात जेसीबी लावला. त्यामुळे पोलीस पुढे वाहनाऐवजी पायी गेले. याच वेळी उंच ठिकाणी बसलेल्या विकास दुबेच्या टोळीने पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला. यात आठ पोलिसांना वीरमरण आले. विकास दुबे हा खतरनाक, कुख्यात अपराधी आहे. दुबेच्या विरोधात 50 गुन्ह्याच्या नोंदी आहेत. त्यात खून, अपहरण, खंडणी सारखी प्रकरणे आहेत. विकास दुबेनं 2001 मध्ये एका पोलीस स्टेशनमध्ये घुसून तत्कालिक राज्यमंत्री शुक्ला यांची गोळी मारुन हत्या केली होती. विकास दुबेच्या गुन्ह्यांचा इतिहास पाहता मोठी टीम त्याला पकडण्यासाठी गेली होती.

कोण आहे विकास दुबे ? विकास दुबे नावाची दहशत,
•विकास दुबे मूळचा कानपूरजवळच्या बिकरु गावचा आहे. हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी असे किमान 60 हून अधिक गुन्हे दुबेवर दाखल आहेत.2001 मध्ये तर पोलीस स्टेशनमध्ये घुसून त्यानं भाजपचे राज्यमंत्री संतोष शुक्लांची हत्या केली होती. त्या प्रकरणात एकाही पोलिसाची विकास दुबेविरोधात कोर्टात साक्ष देण्याची हिंमत झाली नाही. बसपाच्या काळात विकास दुबेचा दबदबा वाढला. कानपूर आणि परिसरात त्याची दहशत वाढली. याच काळात सरकारी कंत्राटापासून ते शाळा-कॉलेज उभी करुन त्यानं करोडोची संपत्ती उभी केली. बिकरुसह आजूबाजूच्या गावांमध्ये विकास दुबेच्या परवानगीशिवाय कुणी ग्रामपंचायतीलाही उभं राहू शकत नाही. गेल्या 15 वर्षात एकदाही बिकरु गावात निवडणूक झाली नाही, शिवाय झेडपीतही दुबेच्याच कुटुंबाचा सदस्य निवडून जातो. आताही विकास दुबेची पत्नी ऋचा दुबे झेडपी सदस्य आहे. दुबेला दोन मुलं आहेत, त्यातला एक इंग्लंडमध्ये एमबीबीएसचं शिक्षण घेतोय, तर दुसरा कानपूरमध्येच शिकतोय.