…अखेर खाकीतली माणुसकी जागी झाली; आजींच्या चोरी झालेल्या पाटल्या पोलिसांनी स्व;खर्चाने दिल्या

0
1796

चिंचवड, दि. ११ (पीसीबी) – गुन्हेगार असो की फिर्यादी यांना पोलिसांकडून मिळणारी वागणूक ही सर्वश्रुत आहे. परंतू, आजीबाईंची तगमग पाहून, अखेर पोलिसांनाही पाझर फुटला आणि मग जागी झाली खाकीतली माणुसकी. सहाय्य्क पोलिस निरीक्षक बलभीम ननावरे यांच्यासह आठ सहकाऱ्यांनी स्व:खर्चाने पाटल्या विकत घेऊन, आजींना दिल्या. त्यामुळे या पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

फेब्रुवारी महिन्यात आजी उपचारासाठी रुग्णालयात गेल्या होत्या. त्या ठिकाणाहून तीन तोळे सोन्याच्या पाटल्या अज्ञात चोरट्याने चोरल्या. या प्रकरणी सांगवी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. परंतू, पोलिसांनाही चोर सापडत नव्हता. ८० वर्षाच्या शांताबाई चिंचणे सांगवी पोलिस स्टेशनच्या चकरा मारुन, पुरत्या वैतागल्या होत्या. तीन तोळ्याच्या चोरीला गेलेल्या पाटल्या, पोलिस आज शोधून देतील, उद्या शोधून देतील, या आशेने त्या नेहमी त्या पोलिसांकडे यायच्या. पण पाटल्या काही सापडत नव्हत्या.

सर बरे आहात का.. ओळखलं का, माझ्या पाटल्या (बांगड्या) गेल्या होत्या. चिंचणे आजी लेकावुनी काळजीने फोन केला तुम्हाला.. अश्या शांत आणि प्रेमळ आवाजातून एका सहाय्यक पोलिस निरीक्षकाला फोनवरून विचारणा होऊ लागली नातेवाईक तर नाहीत एवढ्या प्रेमाने पोलिसांशी कोण बोलणार असा प्रश्न त्यांच्या मनात उपस्थित झाला. पण ज्या वेळी पाटल्याचे नाव घेतले तेव्हा ८० वर्षीय आजींचा चेहरा सहाय्यक पोलिस निरीक्षक यांच्या समोर उभा राहिला. आजीबाईंची ही तगमग पाहून, अखेर पोलिसांनाही पाझर फुटला आणि मग जागी झाली खाकीतली माणुसकी. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून बलभीम ननावरे यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी स्व:खर्चाने चोरील गेलेल्या सोन्याच्या पाटल्या आजींना परत दिल्या. त्यामुळे सर्वत्र परिसातून त्यांचे कौतूक होत आहे.

कोण आहेत ८० वर्षाच्या शांताबाई चिंचणे?

८० वर्षाच्या शांताबाई वयाच्या चौदाव्या वर्षी विवाह बंधनात अडकल्या होत्या. शांताबाईंच्या संसाराला दृष्ट लागली अन् चार वर्षानंतर पती पिराजीने काडीमोड घेतली. पुढील आयुष्य जगण्यासाठी जन्मदात्यांचा सहारा घेतला, मात्र ते नियतीलाही सहन झाले नाही अन् काही वर्षांनी त्या पोरक्या झाल्या. मग सख्ख्या भावानेही घरातून हाकलून दिले आणि सुरु झाला संघर्ष. सध्या त्या एका छोट्याश्या भाड्याच्या खोलीत एकट्याच राहतात. अवघ्या पाच हजार रुपयांच्या पेन्शनवर त्या त्यांच आयुष्य काढतात. ८० व्या वर्षात आपलेसे कोणी नसताना, या पोलिसांनी दाखवलेली आपुलकी, या आज्जींना आयुष्यभराचे आनंद देत आहे.