अखेर एम.जे.अकबर यांचा मंत्रिपदाचा राजीनामा

549

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) – अखेर केंद्रीय मंत्री एम.जे. अकबर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. अकबर यांच्याविरोधात तब्बल २० महिलांनी लैंगिक छळाचे आरोप केले होते. त्यामुळे ते अडचणीत आले होते. 

माझ्यावरील आरोपांविरोधात मी न्यायालयीन लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मी आता परराष्ट्र राज्यमंत्रीपदाचा राजीनामा देत आहे. मला देशसेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुषमा स्वराज यांचा आभारी आहे, असे अकबर यांनी म्हटले आहे.

एम. जे. अकबर पत्रकारितेत असताना त्यांनी नवोदित महिला पत्रकारांची लैंगिक छळवणूक केल्याचे आरोप झाले आहेत. प्रिया रमाणी या पत्रकाराने एशियन एजचे संपादक असताना अकबर यांनी केलेल्या छळाचा आरोप ट्विटरवर केला. त्यानंतर अनेक महिलांनी पुढे येत अकबर यांच्याविरोधात लैगिंक छळाचे आरोप केले. दरम्यान, अकबर यांनी सगळे आरोप फेटाळत मानहानीचा दावा दाखल केला आहे.

दरम्यान, मोदी सरकारने अशा लैंगिक छळ करणाऱ्या अतिरेक्यांना पाठिशी का घालावे, असा सवाल करत काँग्रेससह विरोधकांनी भाजपची कोंडी केली होती. त्यामुळे अकबर यांना राजीनामा द्यावा लागला आहे.