“अक्रोड-पिस्ते खाणारे, मशिनने मसाज करणारे आंदोलक यापूर्वी पाहिले नाहीत”: प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल

0
262

नवी दिल्ली, दि.२६(पीसीबी) : केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी मागील महिन्याभरापासून दिल्लीमध्ये सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनामध्ये दलाल, भांडवलदार आणि अडत्यांचा समावेश असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलीय. तसेच अक्रोड-पिस्ते खाणारे, मशिनने मजास करुन घेणारे आंदोलक देशाने यापूर्वी कधी पाहिले नाहीत, अशी कठोर टीका दरेकर यांनी केली. यासंदर्भातील वृत्त टीव्ही ९ मराठीने दिलं आहे.

“राजू शेट्टी हे पूर्वी शेतकरी नेते म्हणून ओळखले जायचे. मात्र आता त्यांना राजकारणातच जास्त रस असल्याच दरकेर म्हणाले. शेट्टी हे कोणत्या जगात वावरत आहेत?, असा प्रश्नही दरेकरांनी उपस्थित केला. शेट्टी यांचा बालेकिल्ला कधीच उद्ध्वस्त झाला आहे. या किल्ल्याचे बुरुज, चिरे आणि वीटा विखुरल्या गेल्याने त्याची डागडुजी करण्याची गरज शेट्टींना आहे. त्यांची शेतकरी नेता ही ओळख पुसली गेलीय, अशा शब्दांमध्ये दरेकरांनी शेट्टींवर हल्लाबोल केला. शेट्टी हे स्वत:ला अजूनही शेतकरी नेते समजतात हे त्यांच्या डोक्यातील खूळ असल्याचा टोलाही दरेकरांनी यावेळी लगावला. शेतकऱ्यांचा शेट्टींवर विश्वास राहिलेला नसून त्यांचे लक्ष्य आता फक्त विधानपरिषदेच्या आमदाराकीकडे आहे. सत्य स्वीकारणाचे धाडस शेट्टींमध्ये नाही,”, इचलकरंजीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांनी कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर टीका केली.

तसेच शुक्रवारी रयत क्रांती संघटना व भाजपा किसान मोर्चातर्फे चंदूर (ता. हातकणगले) येथे आयोजित करण्यात आलेल्या आत्मनिर्भर किसान यात्रेच्या निमित्ताने सभेत दिलेल्या भाषणामधुनही दरेकर यांनी पुन्हा शेट्टींवर निशाणा साधल्याचे दिसून आलं. शेतकऱ्यांचे नेते म्हणविणारे राजू शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देण्याची भाषा करू नये. निवडणुकांपूर्वी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन उद्धव ठाकरे यांनी कोरडवाहूसाठी प्रति हेक्टरी २५ हजार रुपये व बागायतीसाठी ५० हजार रुपये देण्याच्या वचनाचे काय झाले. शेतकऱ्यांना चिंतामुक्त व कर्जमुक्त करण्याच्या वचनाचे काय झाले याचेही उत्तर जनतेला द्या, असा सणसणीत टोला दरेकर यांनी शेट्टी यांना लगावला. आपल्या भाषणामध्ये देरकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवत सरकारने केवळ खोटी आश्वासने दिल्याची टीकाही केली.