अंगावर पाणी उडाल्याने वाद; परस्परविरोधात विनयभंगाचे गुन्हे दाखल

0
266

हिंजवडी, दि. २८ (पीसीबी) – बांधकामावर पाणी मारत असताना शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर पाणी उडाले. त्यावरून दोन गटात वाद झाला. या प्रकरणात एकमेकांच्या विरोधात विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा प्रकार मंगळवारी (दि. २७) सकाळी मारुंजी येथे घडला.

पहिल्या प्रकरणात एका महिलेने याबाबत फिर्याद दिली असून त्यानुसार एका महिलेसह चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला बांधकामावर पाणी मारत असताना आरोपींच्या अंगावर पाणी उडाले. त्यावरून आरोपींनी महिलेला शिवीगाळ, धक्काबुक्की करून मारहाण केली. आरोपी तरुणाने फिर्यादी महिला आणि तिच्या मुलीसोबत गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. फिर्यादी महिलेचे गावातील पुरुषांशी अनैतिक संबंध असल्याचे म्हणत तिची बदनामी केली असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

याच्या परस्पर विरोधात दुसऱ्या गटातील महिलेने फिर्याद दिली असून त्यानुसार तीन महिलांसह पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांच्या पतीच्या अंगावर पाणी ओतल्याचा जाब विचारला असता आरोपींनी महिलेला आणि तिच्या पतीला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच फिर्यादी महिलेशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. दोन्ही गुन्ह्यांचा तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.