कोल्हापूर, दि.१४ (पीसीबी) : देशात कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात आता कोल्हापूरमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसत असताना ‘कोल्हापुरातील निर्बंध अजिबात शिथील करणार नाही. उलट नियम पाळले जात नसतील तर अधिक कडक करण्यात येतील’, असा कडक इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. दरम्यान, ‘आपल्या जिल्ह्यातील करोना कमी करण्यासाठी सहकार्य करावं’, असं आवाहन अजित पवार यांनी कोल्हापूरवासियांना केलं आहे.
अजित पवार पुढे असंही म्हणाले कि, “निर्बधांच्या बाबतीत कोल्हापूर चौथ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त पॉझिटिव्हीचं प्रमाण कोल्हापुरात आहे. यामुळे येथे निर्बंध अजिबात शिथील केले जाणार नाहीत. उलट कोणी नियम पाळत नसतील तर अधिक कडक केले जातील. आम्ही निर्बंध लादण्यासाठी येत नाही. पण कोल्हापूरने लवकरात बाहेर पडावं यासाठी थोडा वेळ सोसावं लागणार आहे. सकाळी मी अनेकांना मास्कविना पाहिलं. काही जण मास्कऐजी रुमाल वापरतात आणि पोलीस दिसले की तो रुमाल लावतात, असं करु नका, तुम्ही आपलं आरोग्य धोक्यात घालत आहात, निष्पापांनाही याचा फटका बसत आहे. पोलीस, जिल्हाधिकाऱ्यांना निर्बंधांची कडकपणे अमलबजावणी करण्यास सांगितलं आहे. महाराष्ट्रात सध्या दुसरी लाट ओसरत असताना कोल्हापुरात प्रमाण जास्त आहे. कोल्हापूर पहिल्या क्रमांकावर आहे. पहिल्या लाटेत काम उत्तम झालं होतं. पण सध्या करोना आटोक्यात नाही त्याची काय कारणं आहेत; औषध, लसींचं परिस्थिती याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला. लोकप्रतिनीधांशी चर्चादेखील केली.”
“आज या दौऱ्यात येत असताना गृह विलगीकरण कमी करुन संस्थात्मक विलगीकरण झालं पाहिजे यावर भर दिला. फायर, ऑक्सिजन ऑडिट सुरु आहे. लहान मुलांसाठी टास्क फोर्स सुरु करण्यात आलं आहे. टेस्टिंग दीड ते दुप्पट वाढलं पाहिजे असं जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे. टेस्टिंगनंतर रुग्णसंख्या सुरुवातीला वाढली तरी चालेल पण नंतर ते कमी होईल. टेस्टिंग न झाल्याने लोक बाहेर फिरत असतात, त्यामुळे इतरांनाही संसर्ग होतो त्यामुळे वाढवणं गरजेचं आहे,” असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं, दरम्यान खासगी रुग्णालयांनी नियमाप्राणे बिलं लावावीत, कारण नसताना जास्त बिल लावू नये,” असा इशारा त्यांनी दिला.